संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनमजुरांचे कामबंद आंदोलन यशस्वी धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली वनमजुरांचे यशस्वी कामबंद आंदोलन; प्रशासनाला झुकावे लागले! ----- रात्री ९ वाजता वन संचालक अनिता पाटील या
- dhadakkamgarunion0
- Nov 17, 2025
- 3 min read
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनमजुरांचे कामबंद आंदोलन यशस्वी
धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली वनमजुरांचे यशस्वी कामबंद आंदोलन; प्रशासनाला झुकावे लागले!
-----
रात्री ९ वाजता वन संचालक अनिता पाटील यांच्यासोबत चर्चेत सकारात्मक तोडगा
येत्या १७ नोव्हेंबर रोजी मुख्य वनसंरक्षक कार्यालयात पुढील बैठक निश्चित
-----
मुंबई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली (पूर्व) येथे दीर्घकाळापासून सुरू असलेल्या अन्यायाविरोधात धडक कामगार युनियनच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २५० वनमजुरांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला. धडक वनविभाग युनिटचे अध्यक्ष जॉनी वायके यांच्या अध्यक्षतेखाली आणि कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन पार पडले. हे आंदोलन सकाळी १० वाजता सुरू होऊन रात्री १० वाजेपर्यंत अखंड सुरू होते. कामगारांनी “मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही” अशी ठाम भूमिका घेत प्रशासनाला चर्चेच्या टेबलावर आणले.
रात्री ९ वाजता वन संचालक व संरक्षक अनिता पाटील यांच्या उपस्थितीत धडक कामगार युनियनच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीस एसीएफ विश्वजीत्व जाधव, एसीएफ सुधीर सोनावले आणि आरएफओ योगेश महाजन उपस्थित होते. युनियनकडून जॉनी वायके, मनिषा सावंत, भगवान तांदुळकर, रमेश धुरी तसेच जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव सहभागी झाले होते.
कामगारांना शनिवार-रविवार सुट्टी असूनही वनमजुरांना जबरदस्तीने कामावर बोलावले जाते. सोमवार ते शुक्रवार रात्री उशिरापर्यंत काम करून घेतले जाते. यावर तात्काळ बंदी घालावी., वनरक्षक पुंडलिक साळवी यांनी महिला कर्मचार्यांना मानसिक त्रास देत खोट्या तक्रारी करण्याचे प्रकार थांबवावेत आणि त्यांची बदली करावी., वनमजुरांना शासकीय सुट्ट्या मिळत नाहीत; त्या नियमितपणे द्याव्यात., थंब प्रणाली (फिंगर स्कॅन) जबरदस्तीने लागू केली आहे. कार्यालय व कामाच्या ठिकाणातील अंतर मोठे असल्याने मजुरांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात आहे. हा अन्याय तात्काळ थांबवावा., वनमजुरांचा पगार वेळेवर होत नाही; नियमित देण्याची जबाबदारी निश्चित करावी., नाक्यावर व चौकीवर काम करणाऱ्या मजुरांना गणवेश व ओळखपत्र देण्यात यावे., रात्रपाळीतील मजुरांना दांडा व बॅटरी देण्यात यावी., शासकीय घरे जी वनमजुरांना दिली आहेत ती अतिशय खराब अवस्थेत आहेत; भाडे कपात केली जात असूनही दुरुस्ती होत नाही. तात्काळ डागडुजी करण्यात यावी., जंगलात कार्यरत मजुरांना आग विझवताना फायर ड्रेस व बूट दिले जात नाहीत; त्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण होतो. ही अत्यंत गंभीर बाब आहे., आदिवासी बांधवांना बेदखल करून कंत्राटी कामगारांची भरती करण्याचे षड्यंत्र रोखावे., १ नोव्हेंबर २०२५ रोजी दीर्घकाळ काम करणाऱ्या वनमजुरांना अचानक कामावरून कमी करण्यात आले; त्यांना तात्काळ पुनर्नियुक्त करावे., २०१७ पासून मागण्या वारंवार केल्या असूनही पूर्ण झालेल्या नाहीत; यावेळी सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य कराव्यात. आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.
बैठकीत प्रशासनाने काही मागण्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, काही मुद्द्यांवर मुख्य वनसंरक्षक कार्यालयाशी संबंधित निर्णय आवश्यक असल्याने १७ नोव्हेंबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. अलीकडेच काळ्या बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वनमजुराच्या प्रकरणात संबंधित डॉक्टर, एसीएफ व आरएफओ यांना शोकॉस नोटीस देण्यात येईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, “धडक कामगार युनियन नेहमीच कामगारांच्या हक्कांसाठी लढत आली आहे. या आंदोलनाने पुन्हा एकदा कामगारांच्या ऐक्याची ताकद दाखवून दिली. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनमजुरांनी संयम व शिस्त राखून आंदोलन केले. वन संचालक अनिता पाटील यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवून चर्चा यशस्वी केली, याबद्दल त्यांचे आभार. ही लढाई केवळ वनमजुरांची नाही तर त्यांच्या सन्मानाची आहे.” असे यावेळी ते म्हणाले.
धडक वनविभाग युनिट अध्यक्ष जॉनी वायके यांनी बोलताना, वनमजुरांच्या ८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर आता प्रशासनाला कारवाई करावी लागणार आहे. आम्ही स्पष्ट सांगितले आहे की, कोणतीही मागणी दुर्लक्षित राहणार नाही. पुढील बैठकीत सर्व मागण्या लेखी स्वरूपात मंजूर झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही.” असे यावेळी ते म्हणाले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईचे “हरित फुफ्फुस” आहे. या वनक्षेत्रात आदिवासी बांधव आणि वनमजूर हे खरे रक्षक आहेत. आग, प्राणीहल्ले, आणि अवघड परिस्थितीत कार्य करून हे मजूर आपले पर्यावरण जपत आहेत. त्यामुळे शासनाने या “पर्यावरण सैनिकांना” सन्मान, सुरक्षितता आणि स्थैर्य देणे अत्यावश्यक आहे. धडक कामगार युनियनच्या नेतृत्वाखाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कामगारांनी दाखवलेले ऐक्य आणि निर्धार यामुळे प्रशासनाला चर्चेच्या टेबलावर यावे लागले. आता १७ नोव्हेंबरची बैठक निर्णायक ठरणार आहे.
#abhijeetrane #nationalpark #borivali #dhadak #dhadakkamgarunion #photo #aandolan #borivali #maharashtraForest #ganeshnaik


Comments